भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ .ए .पी .जे . अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिन
भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ .ए .पी .जे . अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिन
. अहिल्यानगर (प्रतिनिधी) डॉ .अब्दुल कलाम त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते . साऱ्या भारत देशातील विद्यार्थी युवकांसाठी आदर्शचा दीपस्तंभ करावा असे त्यांचे अतुलनीय कार्य होते म्हणूनच त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो .त्याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी शाळा महाविद्यालय ग्रंथालय शासकीय व निम्म शासकीय कार्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.
अब्दुल पाकीर जैनुलाब्दीनल अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती होते . डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिमत्त्व बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रेरणादायी होते त्यांचा आत्मविश्वास , दुर्दम्य इच्छाशक्ती ,कणखर मन, दिलदार स्वभाव मुळे व आपल्या कृतीतून आणि विचारातून सर्वांना भारून टाकले होते . त्यांनी लिहिलेल्या टर्निंग पॉईंट्स ,’माइंड्स ऑफ फायर (अग्निपंख ) , माय जर्नी अशी पुस्तके देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, एक उज्वल भविष्य घडवण्यासाठी , एक नवीन दृष्टी देण्याचे काम करते .
देशातील तरुणांना वाचनाची सवय लावण्यासाठी त्यांनी प्रोस्ताहित केले आहे .त्यांचे लेखन
स्फुर्तीदायी आहे .त्यामुळे शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांची पुस्तके वाचावीत त्याचबरोबर इतर साहित्याची जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीनेच वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे
आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे . स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना देखील अवांतर वाचनामुळे अनेक संदर्भ मिळतात त्यांची आकलन शक्ती वाढते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वाचनाचा प्रभाव पडतो व्यक्तिगत विकास होण्यास वाचनामुळे खूप मदत होते.
जग बदलत चाललंय आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात फेसबुक ,व्हाट्सअप ,गुगल सारखे विविध माहिती तंत्रज्ञानामुळे हवी ती माहिती आपल्याला कमी वेळात घरी बसल्या मिळते हे तंत्रज्ञानाचे प्रगतीचे लक्षणच आहे पण ते एक दुधारी तलवार आहे त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी केला जातो हे त्यावर अवलंबून आहे .तरीसुद्धा वाचन संस्कृती अशी एक कला सिद्धी आहे ज्यामुळे आपण एकाच वेळी अनेक अनुभव आत्मसात करू शकतो . कथा कादंबरी कविता आत्मचरित्र यांच्या माध्यमातून वास्तवाची जाणीव करू शकतो .जीवनाचे व अवती -भोवतीचे आकलन अधिक समजू शकतो. आजचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुण या वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला आहे त्यामुळे त्यांना दूरदर्शन ,स्मार्टफोन ,टॅबलेट ,कॉम्प्युटर यासारख्या सांधनांचा कमी वापर करून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे ,वाचन संस्कृती रुजवणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे .वाचनाने काय साध्य होऊ शकते हे आजच्या मुलांना दाखवून देण्यासाठी हा उपक्रम शासन स्तरावर राबविण्यात येत आहे .पुस्तके ही सतत आपल्या ज्ञानात भर कशी पाडतात हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे .माजी राष्ट्रपती स्व डॉ .ए . पी . जे .अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरवले जाते .वाचकांनी अशा कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे . अनेक शाळेमध्ये वाचन प्रेमी विद्यार्थ्यांना कलम सरांचे लिखित तसेच त्यांच्या जीवनशैलीवर आधारित लिखाण केलेले पुस्तके भेट देतात .शाळेत ,ग्रंथालयात तसेच शासकीय कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्याने ,अभिवाचन ,चर्चासत्र ,कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन ,ग्रंथ प्रदर्शन निबंध स्पर्धा ,वाचन कट्टा यासारख्या माध्यमातून वाचन चळवळ उभी राहत आहे .आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे त्यामुळे वाचन संस्कृतीचा विकास आणि प्रचार प्रसार आवश्यक असून भाषा विकसित होणेही आवश्यक आहे वाचन संस्कृती विसरून दूर गेलेल्यांना एकत्र आणण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालय त्यातील वृत्तपत्रे ,मासिके व ग्रंथ या मार्फत शक्य होईल .आज प्रत्येक घरात ग्रंथघर असायला हवे प्रत्येक गावात किमान एक ग्रंथालय असलेच पाहिजे .ग्रंथ हे आपले मित्र आहेत ग्रंथ हेच आपले गुरु आहेत म्हणून
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या …अंधाराच्या राती ।
या ग्रंथाच्या तेजा मधून जन्मा येते क्रांती
ग्रंथ शिकविते माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती
निराश जीवा धीर धरुनी पुढे घेऊन जाती ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमुच्या हाती
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या . . . अंधाराच्यारात्री
प्रत्येकाने आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वाचन करावे . स्वानंद साठी वाचन करावे . विचार अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचान करावे वाचनाचे प्रकारे वेगळे आहेत माध्यम ही खूप आहेत पण त्यांचा उद्देश मात्र एकच आहे तो आपल्या मनाची मशागत करणे होय .वाचन संस्कृतीचा हा जागर अधिकच उज्वल होवो .आणि हा दिवस या दिना पुरता मर्यादित न राहता वाचकांनी नेहमीच वृत्तपत्र, ग्रंथ ,नियतकालिके व विविध साहित्य यांचे वाचन करावे हाच उद्देश या वाचन प्रेरणा दिनाचा आहे
चला तर मग वाचन प्रेरणा दिनी संकल्प करू , वाचन चळवळ जतन करू
श्री .संतोष राम वाडेकर
(ग्रंथालय चळवळ कार्यकर्ता )
अध्यक्ष :श्री रामपुष्य सार्व वाचनालय.
अँक्टिव्ह मराठी न्यूज . अहिल्यानगर.







